Site icon

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनीच अहिल्यानगरला पाणी येऊ दिले नाही – माजी खासदार डॉ.सुजय विखे

कान्हूर पठार येथे सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आणि विकास कामांचे लोकार्पण संपन्न


पारनेर / प्रतिनिधी,

पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आणि वडगाव दर्या निसर्ग पर्यटन केंद्राच्या विकास कामांचे लोकार्पण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित भव्य समारंभात सुजय विखे यांनी पाणी प्रश्नावरून थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधत पश्चिम महाराष्ट्र आणि अहिल्यानगर यांच्यातील पाण्याच्या संघर्षाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ अंतर्गत सौर प्रकल्पाचे भूमिपूजनही यावेळी पार पडले.


सुजय विखे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कान्हूर पठाराला पाणी मिळाले नाही, कारण पाण्याचा प्रत्येक नारळ पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी फोडला. हा संघर्ष पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध अहिल्यानगर, पुणे विरुद्ध नगर आणि दुर्दैवाने शरद पवार साहेब विरुद्ध कै. बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी अहिल्यानगरला पाणी येऊ दिले नाही, ही कुकडी कालव्याची वास्तविकता आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, पुणे जिल्ह्यातील नेत्यांची अहिल्यानगर सुजलम-सुफलम होऊ नये, अशी संकल्पना होती, ज्यामुळे हा भाग पाण्यापासून वंचित राहिला.


खासदार लंके यांचे नाव न घेता सुजय विखे यांनी त्यांच्यावरही परखड टीका केली. “पुणे जिल्ह्याशी लढाई असेल तर ती धमक फक्त विखे कुटुंबात आहे. जे लोक नांगर टाकतात, त्यांचा खर्चपाणी पुण्यातून चालतंय, ते तुम्हाला काय पाणी देणार? त्यांचं अस्तित्व पुणे जिल्ह्यामुळे आहे, ते तुमच्या मुलांना भविष्य देऊ शकतील का?” असे सवाल त्यांनी उपस्थितांना विचारले. तसेच, सिस्पे घोटाळ्याचा उल्लेख करत ते म्हणाले, “माझ्यावर हसा, पण सिस्पेमध्ये पारनेरच्या जनतेचे पैसे गुंतले, त्याचे उत्तर कोण देणार?”


वडगाव दर्या निसर्ग पर्यटन केंद्रासाठी ९ कोटी रुपये निधी मंजूर असून, सध्या १.८० कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. या विकास कामांचे लोकार्पण आणि कान्हूर पठाराला सिंचनाचे पाणी मिळावे यासाठी सर्वेक्षणाचा शुभारंभ यावेळी झाला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हे सर्वेक्षण पारनेरच्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. याशिवाय, सौर कृषी वाहिनी योजना २ अंतर्गत सौर प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले.


विश्वनाथ कोरडे यांनी यावेळी सांगितले, “मला निवडणुकीचे तिकीट नको, माझ्या पठार भागाला पाणी द्या आणि त्या कामाची प्रमा माझ्या हातात द्या. मी राजकारण फक्त विकासासाठी करतो. आतापर्यंत अनेक पाणी प्रश्न सोडवले असून, आता राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांच्यासह पठार भागाचा पाणी प्रश्न मार्गी लावणार.”


आमदार काशिनाथ दाते यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला की, “पारनेर तालुक्याच्या पठार भागाचा पाणी प्रश्न फक्त राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटीलच सोडवू शकतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न आता मार्गी लागेल आणि शेतकरी, कष्टकरी जनतेचे हित साधले जाईल.”

“ज्यांना तुम्ही निवडून दिले, त्यांचा पाणी प्रश्नावर अभ्यास होता का? एकदा विचारून पाहा. राजकारणात हुशार होणे चुकीचे आहे. माझा लोकसभेत पराभव झाला, तेव्हा मी स्वतःला विचारले की उगाच डिगऱ्या घेतल्या. बारा वर्षे शिक्षण घेतले तर डिग्री मिळते, पण इथे एका महिन्यात डिग्री मिळते, हे फक्त पारनेर तालुक्यात शक्य आहे,” अशी टिप्पणी सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर नाव न घेता केली.

“लोक माझी टिंगल करत होते, पण तुम्हाला काय मिळाले? सिस्पेसारखा घोटाळा! पारनेरच्या जनतेचे पैसे सिस्पेमध्ये गुंतले, त्याचे उत्तर कोण देणार?” असा थेट सवाल सुजय विखे यांनी उपस्थित केला.

पारनेर तालुक्याच्या पठार भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले प्रयत्न आता फलद्रूप होताना दिसत आहेत. शेतकरी आणि कष्टकरी जनतेला यामुळे दिलासा मिळण्याची आशा आहे.

या सोहळ्याला भाजप अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर, शिवाजी खिलारी, राजाराम एरंडे, वसंत चेडे, सचिन वराळ, माजी सभापती गणेश शेळके, नगरसेवक युवराज पठारे, दत्तात्रय रोकडे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, राजेंद्र शेळके, दादाभाऊ सोनावळे, सुभाष दुधाडे, किसनराव शिंदे, भाजप महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, सुधामती कवाद, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष सुषमा रावडे, युवती तालुका अध्यक्ष अपर्णा खामकर, सागर मैड, दत्तानाना पवार, दिनेश बाबर, सरपंच लहू भालेकर, चेअरमन शिवाजी रोकडे, अब्बास मुजावर, वसंत शिंदे, अर्जुन नवले, सखाराम ठुबे, भरत ठुबे, बबन व्यवाहारे, सुशांत ठुबे, गणेश ठुबे, कानिफ ठुबे, गोकुळ ठुबे यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पदाधिकारी आणि कान्हूर पठार येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Share This News On
Exit mobile version