पारनेर / भगवान गायकवाड,
राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे पिकांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पारनेर ग्रामीण पतसंस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपये देणगी दिली आहे. समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून पतसंस्थेने हा मदतीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी असलेला एक लाख रुपयांचा धनादेश पतसंस्थेच्या वतीने नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. दसरा मेळाव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान हा धनादेश प्रदान करण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी पतसंस्थेचे कौतुक केले.
यावेळी व्यासपीठावर माजी खासदार सुजय विखे पाटील, नगरचे आमदार संग्राम जगताप, पारनेर नगर विधानसभा सदस्य काशीनाथ दाते (सर) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष संध्या सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंतराव चेडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारनेर तालुका महिलाध्यक्ष सुषमा रावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पारनेर ग्रामीण पतसंस्थेने सामाजिक जबाबदारी ओळखत केलेल्या या अर्थसहाय्यामुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोठा हातभार लागणार आहे. संस्थेच्या या विधायक कृतीबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

