नुकसान भरपाई मिळावी विकास रोकडे यांची मागणी
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खडकवाडी, पळशी, वनकुटा, पोखरी, म्हसोबाझाप, कामटवाडी, वारणवाडी, देसवडे, वासुंदे, कर्जुले हर्या, वडगाव सावताळ, सावरगाव, टाकळी ढोकेश्वर आणि मांडवे खु. या परिसरात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया जात आहेत. विशेषत: झेंडू, कांदा आणि बाजरी या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती आहे.
खडकवाडी येथील प्रगतिशील शेतकरी विकास विठ्ठल रोकडे यांच्या नऊ एकरांवरील झेंडू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, विजय पवार आणि शेखर हुलावळे यांच्या झेंडू पिकालाही याचा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून, झेंडूची फुले सडू लागली आहेत. येत्या पंधरा दिवसांत नवरात्र, दसरा आणि दिवाळी सणांमुळे पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथून झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. मात्र, पावसाने ही संधी हिरावली आहे. खडकवाडी परिसरात झेंडू पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, परंतु यंदा शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यात वाहून गेले आहे.
सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कांदा आणि बाजरी पिकांचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे पिकांच्या नुकसानाची पाहणी आणि पंचनामा करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणताही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेला नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. विकास रोकडे यांनी पिकांच्या नुकसान भरपाईसाठी तातडीने पंचनामा करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कृषी विभागाने त्वरित पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे.
खडकवाडी व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झेंडू पिकाचे उत्पादन घेतले जाते सतत दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे झेंडूच्या शेतीमध्ये पाणी साचले असून नुकसान झाली आहे तरी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी पीकपंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.
– प्रगतिशील शेतकरी विकास रोकडे (खडकवाडी)



